hmmm... nostalgia ! (कॉलनीचा गणेशोत्सव)

आज सकाळ पासून कॉलनीच्या देवळातून कसले तरी फेकल्याचे, आणि बांधाबांधीचे आवाज आले, आणि एवढा आनंद झाला.. गणपती आले !! कायम आदल्या दिवशी दिवसभर हे मांडव घालायचे काम, वर्षानुवर्षे चालत आले आहे.. लहानपणी शाळेतून आले की समोरच्या बिल्डींगमधे हा मांडव तयार होताना दिसायचा.. तेव्हा कॉलनीमधे देऊळ , ती मोकळी जागा झाली नव्हती.. तो मांडव पाहून होणारा आनंद खरच अवर्णनीय असे.. संध्याकाळचे खेळ सगळे सोडून त्या मांडववाल्यांचे काम तासन-तास निरखत बसायचे, एव्ह्ढाच उद्द्योग ! बर्‍याचदा त्याच दिवशी, संध्याकाळपासून मॅचेस चालू व्हायच्या.. कॅरम, बॅडमिंटन, चेस वगैरे.. मी नेहेमी प्रमाणे कॅरम आणि बॅडमिंटन मधे भाग घ्यायचे.. आणि बर्‍याचदा हरून यायचे.. पण तरी ते खेळण्यातला आनंद जबरी असायचा.. अधून मधून जिंकल्यावर तर फारच छान वाटायचे... :)

दुसर्‍या दिवशी दुपारपासून आरास करणार्‍यांची, प्रसादाचे काम असणार्‍यांची, आणि अर्थात आमची मिरवणुकीची गडबड चालू व्हायची ! ती नेहेमीची लाल व्हॅन दारं उघडी ठेवून कॉलनीच्या रस्त्यावरून जायला लागली की अक्षरशः हातातलं काम टाकून पळत सुटायचो आम्ही! त्या गाडीमधून गणपतीच्या सुंदर मुर्तीची इतकी वाजत-गाजत मिरवणुक निघायची.. सगळी पोरं-टॊरं जमून आपले घसे साफ करून घेणार.. त्या घोषणा.. मुलांचे नाचणॆ.. बायकांच्या फुगड्या.. तो उत्साह ! :) सगळ्यात शेवटी मग ती मुर्ती देव्हार्‍यात विराजमान होणार.. Artist लोकांनी नेहेमीप्रमाणेच उत्कृष्ट सजावट केलेली असायची.. मुर्ती बसेपर्यंत आमच टाईमपास चाले.. मग आरती च्या वेळेला मात्र न चुकता हजर ! तेव्हा आरत्या पण येत नव्हत्या.. पण जाऊन जाऊन पाठ पण झाल्या.. आणि सगळ्या जमावाबरोबर आरती म्हणण्यातलं थ्रिल अनुभवलं.. अजुनही एकत्र आरती म्हणताना काटे येतात अंगावर.. !! आरती संपली की हमखास होणारी बेहेरे काकांची आणि गुरुजींची मंत्रपुष्पांजलीच्या वेळेची जुगलबंदी!.. फार हसू यायचे तेव्हा.. :D आरती झाली की मुख्य आकर्षण! प्रसाद.... :) कुट-साखर.. आंब्याची बर्फी.. शिरा( प्रसादाचा आणि तो पण!! umm.... yummy !! ) ... :)

रात्रीची जेवण कशीबशी आटोपून लग्गेच पळायचं.. बरोब्बर ९ वाजता कार्यक्रम चालू व्हायचे.. बर्‍याचदा त्यात अस्मादीकांचा सक्रीय भाग असायचाच.. त्यामुळे ती वेगळीच धावपळ.. नाटका-नाचाचे वेगळे कपडे.. मेकप-गेटप... मॅकड्रॅप ची ती नेहेमीची ड्रेपरी!! कपडे सुद्धा ओळखीचे झाले होते! :) दर वेळेला भाग घेऊनही स्टेजवर जातानाची भिती अजुनही आठवतीय... पुर्वी लोकं सुद्धा सगळी यायची कार्यक्रम पाहायला आणि कार्यक्रमही चांगले असायचे.. :) नाटक वा नाच झाला की रात्री ११-११.३० ला मोठ्यांकडून मिळणारा बटाटावडा, किंवा सॅंडविच...! भूक तरी असायची का! पण ते कौतुकाचे एक स्वरूप होते.. आमच्या कॉलनी मधे कायम कला-गुणांना वाव मिळाला.. माझ्यासारखी बुजरी मुलगी .. आणि वर्षानुवर्ष न घाबरता इतक्या लोकांसमोर perform करत होते, यातच कॉलनीचे यश म्हणायचे!!

कार्यक्रमांचे स्वरूप पण ठरलेले असायचे.. पहील्या दिवशी गणेश स्तवन म्हणून गाणं... मग एखादं भरतनाट्यम.. ते झाले की मग खर्‍या कार्यक्रमांना सुरवात! विविध डान्स, कथाकथन, नाट्यछटा, नाटकं... आणि डान्स मधे देखील किती प्रकार! सर्वप्रकारची लोकंनृत्ये.. कोळीनृत्यं, नवरात्रावरच्या गाण्यांवरचा नाच.. रेकॉर्ड डान्स असायचेच पण त्यातही creativity... एकदा आम्ही छायागीत सादर केले होते.. बापरे.. केव्हढी ती गाणी,प्रॅक्टीस... पण प्रोग्रॅम इतका सुंदर झाला.. तसेच आधुनिक रामायण वगैरे... सगळी लोकं अफाट मेहेनत घ्यायचे.. नाटकं पण इतकी विनोदी.. अगदी नावापासून... रंगरंगिले छैलछबिले, शूर राजूची चड्डी ओली वगैरे... :D :D :D पण ही सर्व नाटकं कॉलनीमधल्या लोकांनीच लिहीलेली असायची... direct केलेली असायची.. आणि आम्ही मुलंच त्यात काम करायचो.. :)
दुसर्या दिवशी असाच प्रोग्रॅम असायचा, आणि तिसर्‍या दिवशी व्हायचा आम्च्या कॉलनी मधल्या मुलांनी बसवलेला ऑर्केस्ट्रा... !! सर्व वादक,गायक,निवेदक म्हणजे आमचेच दादा अन ताई लोकं!! काय गाजायचा ऑर्केस्ट्रा!! अगदी १ वाजे पर्यंत चालायचा.. ( तेव्हा वेळॆचं बंधन नव्हतं!)
४थ्या दिवशी याच लोकांचे ३ अंकी विनोदी नाटक..!! काय टॅलंट होतं या लोकांमधे... ! शांतेच कार्ट, गेला माधव कुणीकडे, लग्नाची बेडी ई.ई. नाटकं मी प्रथम या लोकांची पाहीली... ! फारच सुपर्ब!
आणि शेवटच्या दिवशी, म्हणजे संध्याकाळी व्हायचं फन-फेअर.. ! फुल्टू धमाल... भरपुर खाण्याचे आणि खेळण्याचे स्टॉल्स.. मस्त म्युझीक! आणि मित्र-मैत्रीणींचा गोंधळ... २-३ तास एकदम मजा असायची! फन-फेअर झाले की व्हायची तयारी बाप्पांच्या मिरवणुकीची... :( खरंच घरातलं कुणीतरी सोडुन चालल्याची जाणीव व्हायची तेव्हा... ५ दिवस चाललेला गोंधळ संपल्याची जाणीव व्हायची! :(
रात्री व्हायचा बक्षिस-समारंभ.. १०-१२वि झालेल्यांना बक्षिसे असायची.. प्लस, खेळामधे जिंकलेल्या लोकांना, तसेच सगळ्यात जास्त कार्यक्रमात भाग घेतलेल्या मुलाला/मुलीला ही बक्षिस असायचे.. ते बर्‍याचदा वंदनालाच मिळायचं! :) आम्ही आपले वाट पाहायचो हा समारम्भ संपायची... ! कारण त्यानंतर असायचे कॉफीपान.. :) आख्ख्या वर्षभरात कॉफी न मिळाल्यासारखे आम्ही लोकं कॉफी प्यायचो तेव्हा! पैजाही लागायच्या कोण जास्त कॉफी पितो.. needless to say, त्या मीच जिंकायचे! :)
hmmmmm...........
आता यातलं काय उरलं?? जवळपास काहीच नाही.. कारण दादा लोकांच्या पिढीतले आता इथे कुणीच नाही, even आमच्या देखील... सगळी चिल्ली-पिल्ली आहेत आता...
कार्यक्रम हळुहळु संपतच आलेत म्हणा.. कोण जाणे अजुन काही वर्षांनी इतपत तरी काही होईल का?
असं काहीही असलं तरी आमच्या कॉलनीचा गणेशोत्सव हा सगळ्यांचाच वीक-पॉईंट आहे... [ यंदाचे तर गणेशोत्सवाचे २५वे वर्ष आहे! :) ] त्यात आख्खं कुटुंब सहभागी असायचे.. लोकमान्य टिळकांचा हेतू किती चांगला होता हे कळते.. सगळे १५०-२०० फ्लॅट्स एकत्र येऊ शकत.. njoy करू शकत...
असो... मराठी माणूस हा जरा अतीच nostalgic होत असतो हे पटते अशावेळेला.. पुढच्या वर्षीपासून मी हे सगळं वाईट्ट मिस करणारे.. ते वातावरण.. तो उत्साह ! US of A मधे अजुनतरी इतकं कुणी celebrate नाही करत... चालायचंच...
आज हे सगळं आठवलं आणि चक्क माझ्या ब्लॉग वर नविन पोस्ट आलं! हेहे... आठवणींचे हा एक फायदा आहे.. त्या लिहून ठेवल्या की नंतर वाचायला मस्त वाटतात!! :)

टिप्पण्या

Maithillii म्हणाले…
khupach amazing blog ahe....i can so relate to it karan me pan tyach colony madhe vadhle! I miss all that Bhagi....so njoy every moment of this ganeshotsav....

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

'मेरू'

Archives